Marathi Article Series Feedback
Name:*  
E-mail:*
 
Message:*
 
 
॥ बापुसाहेबांना पत्र ॥
 
 
(लेखक: बिपीनचंद्र नेवे, जळगाव)

 

 
  ती. स्व. प. पू. बापूसाहेब यांना साष्टांग दंडवत

पत्र लिहण्यास कारण कि काल संध्याकाळ पासुन मला तुमची फार्फार आठवण येऊन राहीली आहे. जीव नुस्ता कासाविस होऊन ~हायला आहे. येक मोठा पेचप्रसंग समोर उभा ~हायला आहे. हिकड आड आन तिकड व्हिर अशी सिच्युशन आहे. आन पानी कुठवी न्हाई. दोन्ही कोरडयाठाक (आणी समोर पान्याच नळ मुन्शीपाल्टीच्या नळासारखा धोधो व्हातोय हा येक तिसरा तीढा.)

तुम्हाला ठावकच आहे कि पयलेपासुनच आपण तुम्हाला फार मान्तो. आपन जगात दोनच व्यक्तींना मानतो. येक तुम्ही आन दुसरे सायेब. सायेबांनी उठ म्हटल कि उठायच बस म्हटल कि बसायच. हान म्हनल कि हानायच असो. हा सब्जेक्ट तुर्तास बाजूला ठेवा. तुम्हाला मी मानायच कारण म्हणजे शाळपासनचा मी तुमचा फ्यान आहे. तुम्हाला आठवत नसल पण तुम्ही येकदा कमरात लाथ घातली व्हती. चार दिवस हातरुणातून उठवना. तेव्हापासनच आपन तुमचे फ्यान झालो. तुमची कमरत लाथ घालायची स्टाईल मला फार आवडली. ती तुमची स्टाईल तुमची आठवण म्हणून मी आजून जपून ठिवली आहे. आता कदी वसुली झाली नाही तर तुमचाच स्टाईलच्या लाथा घालतो. त्यामुळे सर्व एरीयात आपल कलेक्शन नंबर वन आहे. हे सारे तुमच्या कुरपेमुळेच आसा माजा विश्वास आहे.

गुरुजी तुमचा माज्यावर फार लोभ एकदा मी माज्या वर्गातील पोरीला (ती दोन शेंडया घालायची ती छान, गोरीपान, पण आता नाव आठवत नाही) तिच्या हॅपी बडडेच विश केल. माज्या सोबतच्या मन्याने (तो पन तिच्यावर सॉलिड लाईन मारायच बर) तुमच्याजवळ माजी काडी केली. मी तिला हॅपी बडडेच विश केल तर त्यान तुमाला सांगितल कि मी तिला किश केल. तवा तुमचा फार संताप झाला व पोरीची छेड काढली म्हणून तुम्ही मला बदड बदड बदडल. मग तुमी मला जवळ घेऊन समजावल. पोरीचा नाद सोड. शिक्षान तुला झेपणार नाही. त्यापेक्षा शहरात जा आनी नाव काढ अस सांगीतल. तुमच्या मार्गदर्शनाप्रमाणे वागलो. मुंबैत आलो आनी नावपन काढल. येथील सर्व व्यापारी आता आपल्याला टरकून असतात. सर्व साहेबांची कृपा, त्यांनी सांबाळून घेतल आनी हितवर आलो.

हे समस्त म्हाभारत तुम्हाला सांगायच कारण म्हणजे आता मला तुमचाच सल्ला विचारायचा आहे. सायेब आता आमाला भेटत नाही आन सल्ला पन देत नाहीत. आमच दैवत बडव्यांनी किडनॅप केल हो. (लाईच औघड शब्द माज्या तोंडाला आता ब चि सवयच राहीली नाही). शाखा पन आता तीन तीन होऊ घातल्यात. आपन सरकारच्या विविध सल्लागार समित्यात काम करता. तेव्हा मलाही काही फ्युचरसंबधी सल्ला द्यावा ही विनम्र विनंती.

तुमच गुणी विद्यारथी

 

 

 

चिरंजीव ़़़

अनेक उत्तम अशिर्वाद

तुझे पत्र पावले, वाचून आनंद झाला तसे तुझ्याविषयी बरेच ऎकून होतो. तुझे विविध क्षेत्रातील गुणदर्शन पाहता तु हा पल्ला गाठशील असे मला तेव्हाच (म्हणजे शाळेतच) वाटत होते. तुझी भाषाविषयक जाणीव प्रगल्भ झालेली आहे. व तू आता स्वत: लिहू सुध्दा शकतोस. असो.

तु दहावी फ चा विद्यार्थी होतास व मी नुकताच डी-एड घेऊन नोकरीवर रुजु झालो होतो. केवळ तोंडी परिक्षेवर तू दहावी पर्यंत आला होतास. त्यामुळे तुझ्या माझ्या यात तसे फारच थोडे अंतर असो. खरे म्हणजे तुमच्या गावात आलो तेव्हा मी नाकासमोर चालणारा शिक्षक होतो. परंतु खरे तर तुझ्याच मार्गदर्शनामुळे माझ्यातले सुप्त गुण जागृत झाले. तु मुंबैला गेल्यावर राजकारणात आलो. सोसायटी काढली, कॉलेज काढले, आता बक्कळ पैसा आहे. शेती आहे. गौरी मला लाभली.

अरे गौरी विषयी मी तुला अजून काहीच सांगितले नाही. होय ना ? तु ज्या दोन शेंडेवाल्या पोरीविषयी लिहीले तिचे नाव होते गौरी प्रभुदेसाई. तु छेड काढल्यावर ती माझ्याजवळ आली व रड रड रडली. मला राहवले नाही. मी तीचे डोळे माझ्या रुमालाने पुसले व पुढे जे व्हायचे ते घडले. तु मुंबईला गेलास. मग आम्ही लग्न केले. असो कधी इकडे आलास तर घरी जरुर ये. गौरीला आनंदच होईल.

माझे मार्गदर्शन तुला झाले आहेच. आपण संधी कधी सोडू नये असे माझे मत आहे. असो.

 

कल्याण मस्तु शुभं भवतु:

 

अनेक अशिर्वाद

तुझा प्रेमळ गुरुजी

 
 


बिपीनचंद्र नेवे,
जळगाव

 

 


Yatra Tatra Series Home Page | EJalgaon.com Homepage