Marathi Article Series Feedback

Name:*
E-mail:*
Message:*

 

प्रहार

 

 

डॉ. प्रसन्नकुमार, प्रमोदकुमार रेदासनी

 

 


 

 

    'काल, परवा रात्री उंच झाडावरती माकडांची सभा चालली होती ।

मुख्य माकड सांगत होते, कागद घेऊन वाचत होते!!

    माणसांनी म्हणे माणूसकी सोडली, माकडात मात्र ती जिवंत राहिली ।

    माणसांनी माणसे जिवंत जाळली, माकडांनी माणसे कधीच नाही मारली ॥

    माकडातील माणुसकी जिवंतराहण्यासाठी 'अखिल माकड समाज' कायदाकरील ।

    जो कोणी माकड माणुसकी सोडेलत्याला माकड समाज 'माणूस' म्हणेल॥

    सभेत शांतता पार पसरली एकमाकडीण जोरात किंचाळली ।

    सजा ही फारच कठीण होईल माणूसम्हणवण्यापेक्षा मी आत्मदहन करीन ।

 

'लक्ष्मीबाई एक झुंजार, प्रसन्न व्यक्तीमत्व, समाधानी, चेहऱ्यावर दिसणाऱ्या सुरकुत्यांमधून सुख-दु:खाचे अनेक उन्हाळे पावसाळे अनुभवल्याची साक्ष. ऎन तारुण्यात वैधव्य नशिबी आलेले. उभ्या तारुण्याचा, उमेदीचा काळ काबडकष्ट करुन चार मुलांचे संगोपन करण्याऱ्या घालवलेला. एकाकी चाललेली लढत, श्रीकृष्णाने करंगळीवर सारा गोवर्धन सहजतेने पेललेला, त्याप्रमाणे आईच्या ममतेने दु:खाचा डोंगरही पेललेला. मुलांचे दोनाचे चार हात केल्यानंतर कर्तव्यपूर्तीचा आनंद चेहऱ्यावर झळकला. पण नियतीच्या मनात वेगळेच असावे.

अल्पावधीतच चारही मुलांनी आपल्या चुली वेगवेगळ्या मांडल्या. आईला विश्वासात न घेता आईची वाटणी प्रत्येकाकडे महिनाभर, आईच्या इच्छेला मान न देता तिची सांभाळण्याची व्यवस्था मुलांनी परस्पर केली. म्हातारपणी दर महिन्याच्या शेवटी संध्याकाळचे जेवण आटोपून दुसऱ्या मुलाकडे राहण्याकरीता जायचे. लक्ष्मीबाईंनी मुलांपुढे विनंतीवजा प्रस्ताव ठेवला. प्रत्येकाकडे सलग तीन महिने वास्तव्य करेन. म्हणजे माझी प्रवासात परवड होणार नाही. परंतु चारही मुले-सुना ऎकण्याच्या मन:स्थितीत नव्हते.

गर्भावस्थेत सलग नऊ महिने असहाय्य वेदना सहन करणाऱ्या आईला चारही मुले सलग तीन महिने सांभाळण्यास तयार नाहीत. तारुण्याच्या गुर्मीत धुंद झालेल्यांना विचारावेसे वाटते की, 'एक असहाय्य विधवा आई चार मुलांचे संगोपन करु शकते. पण चार समर्थ तरुण मुले एका म्हाताऱ्या आईला व्यवस्थितपणे संभाळू शकत नाहीत ?' माणूस आज भावनाशून्य झाला आहे. भौतिक सुखाच्या अधीन होऊन विनाशाकडे वाटचाल करीत आहे. 'दोन पायावर चालतो म्हणून त्याला माणूस म्हणावे काय ?

आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी शुक्रवारी संध्याकाळचे जेवण आटोपल्यानंतर लक्ष्मीबाई दुसऱ्या मुलाकडे जाण्याच्या तयारीला लागल्या. पावसाचे दिवस. आकाश काळ्याकुट्ट ढगांनी भरुन आलेले. लख-लखणाऱ्या विजांचा कडकडाट, मुसळधार पाऊस, घराबाहेर पडणे अशक्य. अनामिक भीतीमुळे लक्ष्मीबाईच्या मनात विचारांचे वादळ उठले. भीत-भीत संपूर्ण धैर्य एकवटून लक्ष्मीबाईंनी आपल्या मुलाला विनंती केली "तुम्ही भावा-भावांच्या ठरलेल्या करारप्रमाणे आता मी येथे क्षणभरही थांबू शकत नाही. तुला त्रास होईल पण नाइलाजास्तव आजची रात्री इथ काढावी लगणार". प्रतिउत्तरादाखल मुलगा अनिच्छेने म्हणाला. 'आई थांबायचंच आहे ना, मग हरकत नाही". लक्ष्मीबाई रात्रभर तळमळत होती, कूस बदलत होती. भल्या पहाटे आंघोळ, पुजा-अर्चा आटोपल्यानंतर चहा पीत-पीत पेपर वाचण्यात दंग असलेल्य मुलांसमोरुन जड अंत:करणाने एक-एक पाऊल टाकत त्या घराबहेर पडल्या. दुसऱ्या मुलाच्या कस्टडीत जाण्याकरीता ! मातृ-पितृ भक्त श्रावण बाळाच्या जाज्वल्य इतिहासाची आठवण करुन देणाऱ्या श्रावण महीन्यात हा दुर्दैवी प्रसंग यावा ही विलक्षण शोकांतिका आहे. जन्मदाते आई-वडील व मुलगा हे पवित्र नाते राहू-मंगळाच्या अभद्र युतीत अडकून शापीत झाले आहे. आईला साधा चहासुध्दा न विचारणाऱ्या मुलाची-सुनेची कीव करावी तरी किती? हे आजच्या समाजाचं वास्तव दर्शन आहे. भ्रष्ट समाज मनाचे प्रतिबिंब आहे. मानवतेला काळीमा फासणाऱ्या घरा-घरात घडणाऱ्या असंख्य घटनांचे प्रतीकात्मक, प्रतिनिधिक रुप आहे.

म्हातारपणी आई वडीलांची परवड होऊ नये म्हणून केंद्र सरकारवर संसदेत कायदा करण्याची वेळ यावी ही सर्व तरुण मंडळींना शरमेने मान खाली घालयला लावणारी बाब आहे. आपल्या संस्कृतीचे किती हे अंध:पतन ! यापुढे अशा कृतघ्न मुलांची अब्रुची लक्तरे वेशीला टांगून कठोर शिक्षा करण्याचे काम सरकारच करणार आहे. 'कर्तव्यविमुख तरुणांनो आता तरी जागे व्हा. तुमच्या अक्षम्य पापांचा शंभरावा घडा भरण्याची वेळ जवळ येऊन ठेपली आहे.

अंधारात चाचपडणारी वसुंधरा, सूर्योदयानंतर सूर्यप्रकाशात न्हाऊन निघते. जिवंत, प्रकाशमय, तेजोमय बनते. खुल्य दिल्याने, हातचे राखून न ठेवता सोनेरी किरणांचा वर्षाव करुन रिक्त झाल्यामुळे सांजवेळी सूर्याचे तेज कमी होते. सूर्यास्ताच्या निस्तेज सूर्याची व्यथा काय वर्णावी ! सर्वस्व अर्पण करणाऱ्या निस्तेज सूर्याकडे वसुंधरा पाठ फिरवून यौवनातील चंद्राच्या संगतीत रममाण होते. तेजहीन सूर्यास कवेत घेण्यास वसुंधरा तयार नाही. अशा कृतघ्न वसुंधरेस, तळमळणारा सूर्य शाप देतो व हळूहळू ती काळ्याकुट्ट अंधारात गडप होते. तरुण माणसा, तुझेही हाल असेच होणार आहेत. जन्मदात्यांना ओझे म्हणून निर्दयी, अमानवी वागणूक देणाऱ्यांच्या संसारविश्वात दु:खरुपी अंध:कार होणारच ! असह्य प्रसव वेदना सहन करणारी, मायेने दूध पाजणारी, चालवायला शिकवणारी, सु-संस्कृत शिक्षण करण्याकरीता आहोरात्र मुलांच्या प्रगतीचा ध्यास घेणारी आई आणि उपकारकर्त्या जन्मदात्यांचा मुलांना विसर पडतोय कसा? हे न उलगडणारे कोडे आहे.

मध्यंतरी राजस्थानातील जोधपूरजवळ राष्ट्रीय महामर्गावर ट्रकच्या धडकेने माकडांच्या टोळीतील एक माकड अर्धमेले होऊन रस्त्यावर पडले होते. सहकारी माकडांनी त्याच्या संरक्षणार्थ गराडा घालून रस्त्यावर ठाण मांडले. शेवटी पोलिसांच्या मदतीने राष्ट्रीय महामार्ग सुरळीत करावा लागला. खरंच, माणसं जनावरासारखी वागायला लागली व जनावरं माणसासारखी! एकेकाळी रानावनात भटकणाऱ्या माणसांच्या दुर्बलतेची कीव करुन नियतीने आपल्याला भरभरुन दिले आहे. उत्क्रांतीचे दान, बुध्दीचे धारदार शस्त्र आणि सोबत माणुसकीचा वसा. आता आतापर्यंत तू वसा चालवला. पण हळूहळू अंगी स्वार्थ भिनत गेला. अन माणुसकीचा वसा टाकून दिला. या धुर्तपणावर कदाचित तुला अभिमान वाटत असेल, पण म्हाताऱ्या जन्मदात्यांची हेळसांड करण्याऱ्या तुला तुझ्याच मुलांच्या नजरेने न्याहाळत आहे नियती! तुझ्या नकळत घडत आहेत त्यांच्यावर जन्मदात्यांविषयी अनादराचे कु-संस्कार! किमान गरजांपेक्षा, तुझ्या मुलांच्या अनावश्यक सुख-सुविधांकरिता तू जन्मदात्यालाच विसरत आहेस. तीच तुझी मुलं सज्ञान व सशक्त झाल्यावर वृध्दावस्थेत तुलाच घराबाहेर काढणार नाही कशावरुन? तेव्हा नियतीचे गुपीत तुला कळेल. पण तोपर्यंत खूप उशीर झालेला असेल.  

 

 

डॉ. प्रसन्नकुमार रेदासनी (जैन)

मो. नं. ९४२२२७५१०८

 


Yatra Tatra Series Home Page | EJalgaon.com Homepage